
वाघाचा शावक सुदृढच, सुखरूप जंगलात गेला
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :-
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील, गोविंदपूर बिटा मधील खरबी येथे मागील चार दिवसापासून जंगला लगत असलेल्या तलावात ठाण मांडून बसलेल्या व अशक्त व अस्वस्थ दिसणाऱ्या एका वाघाच्या त्यांच्या आईने सोडून दिलेल्या अंदाजे फक्त १३ महिन्याच्या बछड्याला समोरील उपचाराकरिता त्याला रेस्क्यु करण्याची योजना वनविभागाच्या वतीने आखण्यात आली व त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्याला पकडण्याची पूर्ण तयारी करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी रात्र झाल्यामुळे रेस्क्यूची कारवाई थांबवण्यात आली होती दुसऱ्या दिवशी पुन्हा राबविण्यात आली. त्याकरिता चंद्रपूर ची आर. आर. टी. तळोधी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी यांनी त्याला पकडण्याचे पूर्ण नियोजन केले.
मात्र त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू असताना त्याच्या निदर्शनास आलेल्या तेज हालचाली व त्याची चाल-ढालवर सूक्ष्म निरीक्षण करून तो सुदृढ असल्याचे जाणवले. व जंगलाचे दिशेने सुखरूप व सुदृढ पणे त्या वाघाच्या शावकाला जातांना पाहुन वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला. तेव्हा त्याच्या आरोग्याची बद्दलची व त्या चार दिवसाची काळजी व उत्कंठा शेवटी संपली.
यावेळेस उपस्थित असलेल्या रेस्क्यूसाठी आलेल्या पशुचिकीत्सक डॉ.खोब्रागडे, यांनी “हा वाघाचा बछडा पूर्णपणे सुदृढ असल्याने त्याला रेस्क्यू करण्याची आवश्यकता नसून, त्याच्यावर काही दिवस लक्ष ठेवणे गरजेचे आहे.” असे सुचवले. सहायक उपवनसंरक्षक के.आर. धोंडणे, वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा, परिक्षेत्र अधिकारी एस.एस.कडनोर, महेश गायकवाड, यांनी यावर सहमती दर्शवली.
या रेस्क्यू करिता व त्या वाघाच्या हालचालीवर सतत चार दिवस लक्ष वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, वनरक्षक गौरकर, श्रीरामे, पेंदाम वनरक्षक हे ठेवून होते.
तसेच ‘स्वाब’ संस्थेचे व झेप संस्थेचे सदस्य , संपूर्ण पी.आर.टी. चे सदस्य यांनी सहकार्य केले.
